गर्भवती महिलांसाठी आरोग्यवर्धक टिपा (Meditation for Pregnancy in Marathi)

गर्भारपणाचा काळ एक तर उत्कंठता वाढवतो व त्याच बरोबर त्याचे शरीरावर आणि मनावर बरेच बदल घडवून आणतो. हा सुंदर कालावधी आनंदी आणि आरामदायक बनविण्यासाठी काही सूचना.

“तुम्ही गर्भवती आहात” हीच आनंदाची बातमी जाणल्यावर तुमची आतुरता वाढते. एक नवीन जीव तुमच्या शरीरामध्ये उमलत असल्याची भावना, एका छोट्या जीवाचे तुमच्या जीवनात आगमन होणार हा क्षण साजरा करण्यासारखा आहे.. परंतु याचबरोबर तुमच्यामध्ये शारीरिक आणि भावनिक बदल होण्याची देखील वेळ आहे. तुम्हाला गंमत वाटत असते की तुमचे बाळ दर आठवड्यागणिक आकार घेत असते. त्याच वेळी काही मनोरंजक तर काही हाताळण्यास अवघड असे तुमच्यामधील नवीन बदल देखील जाणवतील.

तुमच्या आयुष्यातील या सुंदर कालावधीमधील हे बदल तुम्ही आनंदाने स्वीकारू शकला तर? होय. ते सहज शक्य आहे. दिवसातील काही मिनिटे डोळे मिटून - “स्व: सोबतच  बसा” तुमच्या गर्भारपणातील दर तिमाही मध्ये होणारे बदल स्वीकारून  त्यांच्यासह चांगले जीवन कसे जगावे यावर काही उपाय.

पहिली तिमाही

तुमच्यामध्ये काय बदल घडत असतात:

शरीरामध्ये घडणाऱ्या संप्रेरकांच्या बदलांमुळे सकाळी-सकाळी मळमळल्यासारखे होते, जळजळ, बद्धकोष्ठता किंवा चक्कर आल्याचे जाणवते. तसेच आवडते खाद्य पदार्थ देखील खाण्यास नको वाटतात.

आमची सूचना:

या कालावधीमध्ये या ध्यान करणे सर्वांवर उत्तम उपाय. आपल्या शरीरामधील प्राण शक्ती वाढवण्यासाठी ती एकमेव प्रक्रिया आहे, खास करून आपणास जेंव्हा गरगरून प्राणशक्ती कमी जाणवत असेल. या कालावधीमध्ये तुमच्या गर्भाच्या वाढीसाठी तुमच्या शरीरामध्ये ज्यादा ऊर्जेची गरज असते आणि “ध्यान” हा एक ऊर्जेचा नैसर्गिक स्तोत्र आहे.

जेंव्हा तुम्ही नियमित ध्यान करता, तेव्हा तुमचे शरीर आपोआपच शरीरास उपयुक्त आहाराची निवड करत राहते. आणि कालांतराने आपल्या आरोग्यास हानिकारक आणि बाहेरील खाद्यपदार्थ आवडेनासे होतील. हे तुमच्या गर्भात असलेल्या बाळासाठी उपयुक्त आहे.

मेघना कालता, ज्या नियमित ध्यान करतात, त्या म्हणतात, “योग आणि ध्यान संपूर्ण गर्भारपणामध्ये मला उपलब्ध असणारे उपयुक्त साधन होते. इतर महिलांना खूप काही गोष्टी खाव्याश्या वाटतात, परंतु मला फळे उदा. संत्रे, आंबे आणि इतर सकस आहार खावासा वाटे. माझे शरीर तळीव आणि बाहेरील खाद्य पदार्थ टाळत असे.

तुमच्या गर्भाशयातील बाळांमध्ये काय बदल घडत असतात:

तुमचा गर्भ हळू हळू वाढत असतो- त्याचे केस, नखे, डोळे, कान, ध्वनितंतू, आणि स्नायुंना आकार प्राप्त होत असतो.

आमची सूचना:

जेंव्हा गर्भाचे कान विकसित होत असतात, त्या काळात सौम्य संगीत उदा: वीणावादन, मंत्रोच्चार ऐकणे हितकारक असते, हलके फुलके चित्रपट पहावेत. या सर्वांचा बाळाच्या मज्जा संस्थेवर देखील परिणाम होत असतो.

पहिल्या दोन तिमाही मध्ये डॉक्टरच्या सल्ल्याने मार्जारासन, त्रिकोणासन, पवनमुक्तासन सारख्या आसनामुळे गर्भारपणातील त्रास कमी होऊन बाळंतपणा सोयीचा होईल.

पथ्य संदर्भात सूचना :

पहिला महिना: – थंड दुध, शरीराला पचेल असे हलके अन्न घ्या. आंबट, उग्रवासाचा आहार टाळा, गर्भारपणात जाणवणाऱ्या बध्दकोष्ठ्तेसाठी मृदू अनुलोमन किंवा मत्रावस्ती सारखी आयुर्वेदिक औषधे घ्या.

कोणतीही औषधे सुरु करण्यापूर्वी वैद्याचा सल्ला घेणे योग्य.

दुसरा महिना – दिवसभरात थोड्या थोड्या अंतराने थोडा सकस आहार घेत राहावे. फळांच्या रसामुळे मळमळ, उलटी होऊ शकते, म्हणून टाळावे. आहारात दुध, भात, शहाळे, भाताची पेज, खीर आणि तुपाचे सेवन उत्तम.

तिसरा महिना – दुधाची साय, मध आणि तूप सेवन करावे.

दुसरी तिमाही

निरोगी गर्भारपणासाठी उपयुक्त ध्यानावस्था त्वरित प्राप्त होण्यासाठीच्या सूचना  

  • निरोगी गर्भारपणासाठी उपयुक्त ध्यानावस्था त्वरित प्राप्त होण्यासाठीच्या सूचना दिवसातील ठराविक वेळ ध्यानासाठी काढा. उत्तम फळ प्राप्तीसाठी दररोज एकाच वेळी ध्यान करावे. सकाळी, दुपारच्या जेवणापूर्वी किंवा सांयकाळी..
  • शांत आणि आरामदायी जागा- जिथे कोणताही अडथळा होणार नाही, अशी जागा निवडा.
  • जर घबराहट किंवा मनाची चल-बिचलता होत असेल तर काही मिनिटे ध्यानाला बसा, त्यामुळे  मन स्थिर होण्यास मदत होईल.
  • मंत्रोच्चार किंवा वाद्य-संगीत ऐकताना डोळे बंद राहू द्या. असे केल्याने आपोआप तुम्ही ध्यानस्थ व्हाल.

तुमच्यामध्ये काय बदल घडत असतात:

आता तुमच्या बाळाने हालचाल सुरु केली असल्याने तुमचे कुतुहूल जागृत झालेले असते, या काळात मनाची चल-बिचलता वाढून भावनिक चढ-उतार होऊ शकतात.

आमची सूचना:

या कालावधीत तुमच्या मनातील चल-बिचलता आणि भावनिक चढ-उतारांची तुम्ही शिकार होत असल्याने, तुमच्या पतीला देखील तुमच्यातील या बदलांना संयमाने सावधपणे सामोरे जाण्यास तयार असणे गरजेचे आहे. यासाठी दोघांनी काही काळ एकत्रित ध्यान करणे फायदेशीर ठरेल. यामुळे दोघांमध्ये शांती-सुसंवाद प्राप्त होईल जेणेकरून तुमच्यामधील भावनिक चढ उतारांना रोखता येईल.

तुमच्या गर्भाशयातील बाळांमध्ये काय बदल घडत असतात:

बाळाची पंचेंद्रिये विकसित होत असतात. ते गर्भाशयात उचकी आणि जांभई पण देत असते.

आमची सूचना:

या कालावधीमध्ये तुमचे बाळ तुमच्यातील सर्व भावनांना अनुभवत असल्याने, तुम्ही आनंदी, निवांत आणि शांत राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्हाला काय वाटते याचे तरंग बाळ आपसूकच अनुभवत असते. अशावेळी “सहज समाधी ध्यान” तुमच्यासाठी आणि बाळासाठी विशेष लाभदायक होईल. संपूर्ण गर्भारपणात सहज मंत्रांद्वारे दिवसातून तीन-चार वेळा ध्यान करू शकता.

तिसरी तिमाही

तुमच्यामध्ये काय बदल घडत असतात:

बाळंतपणापुर्वीचा हा छोटा परंतु आव्हानात्मक काळ. शारीरिक वाढीमुळे तुम्हाला अस्वस्थ-त्रासदायक वाटत असते, अतिरिक्त वजन वाढीमुळे आणि बाळंतपणासाठी बाळ सरकले असल्यामुळे ओटीपोट आणि त्या खालील भागामाध्ये ताण जाणवत असतो. तसेच पाठ दुखीमुळे तुमच्या हालचाली वेदनादायक होत असतात.

आमची सूचना:

मनःशांती तसेच भावनिक समतोलांना हाताळण्यासह शरीर आरामदायी करण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरते. गर्भारपणातील शेवटच्या टप्प्यामध्ये मज्जा संस्थेवरील ताण- ध्याणामुळे कमी होतो. या काळात श्री श्री रविशंकरजी द्वारा रचित ‘सुदर्शन क्रिया’, जी प्रभावी श्वसन प्रक्रिया आहे, त्याचा सराव तुम्ही करू शकता. त्यामुळे बाळ-बाळंतीण दोघांनाही बाळंतपणाच्या प्रक्रियेमध्ये प्रभावीपणे मदत होते.

बाळंतपण जवळ येईल तसे आतुरता वाढते, तुमचे कुटुंबीय देखील नवागतासाठी तितकेच उत्सुक असतात. या आनंदामध्ये काही प्रमाणात ताण-तणाव निर्माण होतात, येथे देखील ध्यानाचा भरपूर लाभ होतो. प्रियजनांसोबत ध्यान करणे योग्य. सामुहिक ध्यानाचा परिणाम नेहमी जास्तं होतो. याच्यामुळे सर्वांनाच आराम मिळतो आणि सर्वजण आनंदी रहातात, ‘कसे आणि काय करणे गरजेचे’ आहे, याबाबतीत सावध आणि सजग होतात.

गर्भवती मातांसाठी पाककृती

गर्भवती आणि स्तनपान देणाऱ्या मातांसाठी लाडूची कृती.

अंजीर-२५० ग्राम
जर्दाळू-२५० ग्राम
मनुके-२५० ग्राम
बदाम- १०० ग्राम
पिस्ता- १०० ग्राम
काकडीचे बी- १०० ग्राम
सुर्यफुल बी-१०० ग्राम
भोपळ्याचे बी-१०० ग्राम
टरबूज बी-१०० ग्राम
अक्रोड- १०० ग्राम
चारोळे-५० ग्राम
जायफळ- ३ नग
वेलदोडे-२५ ग्राम
केशर- २ तोळे

कृती :

अंजीर, मनुके आणि जर्दाळू यांचे छोटे तुकडे करा. बदाम, पिस्ता, काकडी, सुर्यफुल, भोपळा, आणि टरबूज यांचे बिया, अक्रोड, चारोळे, वेलदोडे आणि जायफळ एकत्र भरडा. सगळे पदार्थ एकत्र मळून ताटामध्ये पसरवा आणि चौकोनी तुकडे करा.
दररोज सकाळी कोमट दुधासोबत एक तुकडा खा.

 

सहज समाधी ध्यान तज्ञ भारती हरीश आणि आयुर्वेदिक तज्ञ डॉ. विद्या यांनी पुरवलेल्या माहितीच्या आधाराने लेखिका- प्रितिका नायर.
लाडूची कृती, आयुर्वेदिक आहार तज्ञ कौशनी देसाई.
रेखाटन- वर्षा सक्सेना.