ध्यानाबद्दल सर्वसामान्य गैरसमज
१. ध्यान म्हणजे एकाग्रता
ध्यान म्हणजे एकाग्रता नव्हे. एकाग्रता हा ध्यानाचा फायदा आहे. एकाग्रतेसाठी प्रयत्नांची आवश्यकता असते, ध्यान म्हणजे मनाची पूर्ण विश्रांती. ध्यान म्हणजे जाऊ देणे आहे आणि जेव्हा ते घडते तेव्हा तुम्ही खोल विश्रांतीच्या अवस्थेत असता. जेव्हा मन शांत होते, तेव्हा आपण अधिक चांगले लक्ष केंद्रित करू शकतो.
२. ध्यान ही एक धार्मिक प्रथा आहे
योग आणि ध्यान या प्राचीन पद्धती आहेत, ज्या सर्व धर्मांच्या पलीकडे आहेत. ध्यानासाठी कोणत्याही धर्माचा अडसर नाही. खरं तर, ध्यानामुळे धर्म, राष्ट्रे आणि श्रद्धा एकत्र येऊ शकतात. जसा सूर्य सर्वांसाठी प्रकाशतो आणि वारा सर्वांसाठी वाहतो, त्याचप्रमाणे ध्यानाचा सर्वांना फायदा होतो. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “आम्ही सर्व पार्श्वभूमी, धर्म आणि संस्कृतीच्या लोकांना उत्सवाच्या भावनेने येऊन ध्यान करण्यास प्रोत्साहित करतो.
सहज समाधी ध्यान योग
मनःशांती वाढवा • आरोग्य सुधारा • मनाची सुस्पष्टता वाढवा • अंतर्ज्ञान विकसित करा
• मनःशांती वाढवा
• आरोग्य सुधारा
• मनाची सुस्पष्टता वाढवा
• अंतर्ज्ञान विकसित करा
३. ध्यान हे पद्मासनात बसून करावे
पतंजली योग सूत्रे हा एक वैज्ञानिक अभ्यास आहे जो मनाचे स्वरूप सविस्तरपणे उलगडतो. ‘स्थिरम् सुखम् आसनम’ हे महर्षी पतंजली यांचे योगसूत्र आहे. ते म्हणतात की ध्यान करताना, आरामात आणि स्थिर राहणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे आपल्याला सखोल अनुभव होण्यास मदत होते. तुम्ही मांडी घालून, खुर्चीवर किंवा सोफ्यावर बसू शकता. जेव्हा तुम्ही तुमचे ध्यानास बसता तेव्हा तुमच्या पाठीचा कणा ताठ ठेवा. आपले डोके, मान आणि खांद्याना आरामात ठेवा.
४. ध्यान हे वृद्धांसाठी आहे
ध्यान हे सर्वांसाठी आहे आणि सर्व वयोगटातील लोकांच्या जीवनाचे मूल्य वाढवते. आठ – नऊ वर्षांच्या कोवळ्या वयात ध्यान करायला सुरुवात करता येते. जसे आंघोळीने शरीर स्वच्छ होते, तसेच ध्यान केल्याने मन स्वच्छ आणि तणावमुक्त राहते.
५. ध्यान हे संमोहन सारखे आहे
ध्यान हा संमोहनावर उतारा आहे. संमोहनामध्ये, व्यक्तीला तो किंवा ती काय करत आहे याची जाणीव नसते. ध्यान म्हणजे प्रत्येक क्षणाची पूर्ण जाणीव. संमोहन व्यक्तीला त्याच्या मनावर उमटलेल्या त्याच संस्कारातून घेऊन जाते. ध्यानामुळे व्यक्तीला अशा संस्कारातून मुक्ती मिळते. ते आपली चेतना ताजी आणि स्पष्ट करते. संमोहन चयापचय क्रिया वाढवते, ध्यान ती कमी करते.
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “जर तुम्ही दररोज प्राणायाम आणि ध्यानाचा सराव केला तर तुम्हाला कोणीही संमोहित करू शकणार नाही.
६. ध्यान म्हणजे विचारांवर नियंत्रण ठेवणे
विचार आमंत्रण देऊन येत नाहीत. ते आल्यानंतरच आपल्याला त्यांची जाणीव होते. विचार हे आकाशातील ढगांसारखे असतात. ते स्वतःहून येतात आणि जातात. विचारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे आणि आरामशीर मनाची गुरुकिल्ली म्हणजे प्रयत्नशून्यता. ध्यान करताना तुम्ही चांगल्या विचारांची लालसा करत नाही आणि वाईट विचारांचा विरोधही करत नाही. तुम्ही साक्षीभावाने विचारांच्या पलीकडे जाऊन अंतर्मनातील खोल शांततेत जाता.
७. ध्यान हा समस्यांपासून दूर पळण्याचा एक मार्ग आहे
याउलट, ध्यान तुम्हाला हसतमुखाने समस्यांना तोंड देण्याचे सामर्थ्य देते. परिस्थिती आनंददायी आणि रचनात्मक पद्धतीने हाताळण्याचे कौशल्य तुमच्यात निर्माण होते. परिस्थिती जशी आहे तशी स्वीकारण्याची आणि जाणीवपूर्वक कृती करण्याची क्षमता तुम्ही विकसित करता. तुम्ही भूतकाळाचा विचार करत नाही किंवा भविष्याची चिंता करत नाही. ध्यानामुळे आंतरिक शक्ती आणि स्वाभिमान वाढतो. जीवनात आव्हाने आली तरी ध्यानाचा नियमित सराव आपल्याला आत्मविश्वासाने व वेगाने पुढे जाण्यास मदत करतो.
८. आनंदाचा अनुभव घेण्यासाठी तासनतास ध्यान करावे लागते
सखोल अनुभव घेण्यासाठी तासनतास बसून राहण्याची गरज नाही. त्या अंतर्मनाशी तुमचा क्षणभरातच संबंध येऊ शकतो. दिवसातून दोनदा २०मिनिटांचे सहज समाधी ध्यान तुम्हाला अंतर्मुख करण्यासाठी पुरेसे आहे. जेव्हा तुम्ही दररोज ध्यान करायला लागाल तेव्हा तुमच्या ध्यानाची गुणवत्ता सुधारेल. तुम्ही ध्यानाचे फायदे देखील अनुभवू लागाल.
९. जर तुम्ही ध्यान केले तर तुम्ही संन्यासी (भिक्षू/ साधू) व्हाल
ध्यान करण्यासाठी किंवा आध्यात्मिक मार्गावर प्रगती करण्यासाठी तुम्हाला भौतिक जीवन सोडण्याची गरज नाही. खरं तर, तुम्ही ध्यान करता तेव्हा तुमच्या आनंदाची गुणवत्ता सुधारते. आरामशीर आणि शांत मनाने, तुम्ही आनंदी राहू शकता आणि तुमच्या सभोवतालच्या इतरांनाही आनंदी करू शकता.
१०. ध्यान हे विशिष्ट वेळ आणि दिशेलाच केले पाहिजे
ध्यानासाठी कोणतीही वेळ चांगली असते आणि ध्यानासाठी सर्व दिशा उत्तम असतात. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे पोट भरलेले नसावे, अन्यथा तुम्ही ध्यान करण्याऐवजी लगेच झोपाल. परंतु सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी ध्यान करणे चांगले. ते तुम्हाला दिवसभर शांत आणि उत्साही ठेवते.
आम्ही आशा करतो की आम्ही ध्यानाबद्दलचे सामान्य गैरसमज दूर् झाले असतील. आता, ध्यान केल्याने तुम्हाला कोणते परिणाम आणि फायदे मिळू शकतात याबद्दल तुमच्यात अधिक स्पष्टता आली असेल.












