नातेसंबंधात विक्षिप्त वागणाऱ्या व्यक्तीचा एक आजारी व्यक्ती म्हणून विचार केला पाहिजे.तिच्यातील ज्ञानाचा,शहाणपणाचा अभाव हे त्याचे प्रमुख कारण आहे. त्या व्यक्तीची पार्श्वभूमी,समंजसपणा नसणे, अज्ञान आणि आध्यात्मिक ज्ञानाचा अभाव या गोष्टींशी हे संबंधित आहे.जोडीदार व्यक्ती तुम्ही दुखावले जाल असे वागत असेल तरी तुम्ही त्या व्यक्तीशी शहाणपणाने वागणे गरजेचे आहे.
प्रतिसाद हवा, प्रतिक्रिया नको
पीडित असणे (आपल्यावर अन्याय झाला आहे अशी भावना असणे ) आणि अपराधीपणाची भावना असणे या दोन जाणीवांमध्ये मानवी मन दोलायमान होत असते.नातेसंबंधात यापैकी एकही भावना असणे हितकारक नाही. दोन्हीही भावनांमुळे दुरावाच निर्माण होतो. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही पीडित आहात, तर तुमचे नाते सर्वसामान्य राहू शकत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही काहीतरी चूक केली आहे आणि तुम्ही अपराधी आहात,तरीही तुमचे नाते सामान्य राहू शकत नाही..
तुम्हाला दोघांमध्ये एक उत्तम संतुलन शोधण्याची आवश्यकता आहे. लगेचच काही कृती करु नका! दररोज काही मिनिटांसाठी तरी साक्षीदार बना. आंतरिक जाणीव तुम्हाला शहाणपणाने वागण्यास मदत करु शकेल.
नाती मागणीच्या भावनेतून नाही तर योगदान देण्याच्या भावनेतून निर्माण झाली पाहिजेत . मग असे नाते चांगल्या प्रकारे जोपासले जाईल. जर दुसऱ्या व्यक्तीकडून आपण काय घेऊ शकता या स्वरुपात ते असेल तर नातेसंबंध त्रासदायक ठरेल. पण जेव्हा तुम्ही अशी वृत्ती बाळगता की, “मी या व्यक्तीचा एक भाग होणार आहे. मी जे काही करणे शक्यआहे, ते करेन,” तेव्हा मग ते नाते निरोगी राहू शकते.
स्वतःवर अन्याय झाल्याची भावना आणि अपराधीपणाची भावना, या दोन जाणीवांमध्ये मानवी मन दोलायमान होत असते. दोन्हीपैकी कोणतीही भावना नात्याकरिता हितकारक नसते.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
फसवणूक करणारे जोडीदार
एखादी व्यक्ती आपल्या जोडीदाराची फसवणूक का करते? कारण त्यांच्याकडे उच्चतम आनंद आणि समाधान नसते. हृदयाला जुन्या गोष्टींची आस असते पण मन नवीन गोष्टींच्या दिशेने धावते. उदाहरणार्थ:तुम्हाला जुन्या मित्राचा अभिमान वाटतो आणि नवीन घेतलेल्या संगणकाचा अभिमान वाटतो, नवीन मित्राचा आणि जुन्या संगणकाचा नाही. नवीन गोष्टींमुळे मनाला आनंद मिळतो. पण असा आनंद टिकाऊ नसतो. फसवणूक करणाऱ्या व्यक्तीला हे असे का घडते हे माहित नसते. ते ऊर्जेचा एक सुंदर स्त्रोतआहेत, खूप मोठ्या गोष्टीचा भाग आहेत, अशा विशाल दृष्टिकोनातून ते जीवनाकडे पहात नाहीत.
प्रेम करणारी व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलते तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त त्रास होतो. पण तुम्हाला हे माहित असले पाहिजे की त्या व्यक्तीला खरे बोलण्यापेक्षा तुमचे प्रेम जास्त महत्त्वाचे वाटते. तिला भीती असते की आपण तुमच्या प्रेमाला वंचित होऊ. ही भीती त्या व्यक्तीला खोटे बोलण्यास भाग पाडते.
तुम्ही प्रेमाची खूप कदर करता म्हणून खोटे बोलायची तसदी घेता! तुम्हाला एकमेकात असा मोकळेपणा निर्माण करावा लागेल की जेणेकरुन खुल्या दिलाने संवाद साधता येईल.
तुमच्या आईबरोबर ते मायेचे नाते असते. तुम्हाला माहीत आहे की तुमची आई तुम्हाला झिडकारणार नाही. म्हणून तुम्ही बहुतेक वेळा तिला सर्वकाही सांगता. लग्नाची नाती अशी का नसावीत ? लग्नाच्या नात्यात तुम्ही असा मोकळेपणा निर्माण करु शकता का?
क्षमा न करण्यापेक्षा, क्षमा करणे सोपे
तुमच्या जोडीदाराने केलेल्या अक्षम्य कृत्याबद्दल त्याला / तिला क्षमा करणे खूप कठीण आहे का? जेव्हा एखादी गोष्ट खूप कठीण असते तेव्हा तुम्हाला ती का करावी लागते? ती करण्याचा काही फायदा आहे का? काय सोपे आहे? गत गोष्टींना धरुन राहणे की क्षमा करणे? जर तुम्ही एखाद्याला क्षमा करत असाल तर तुम्हाला याचा विचार करावा लागेल की तुम्ही कोणासाठी क्षमा करत आहात.
जेव्हा तुम्ही प्रेम करत असलेली व्यक्ती तुमच्याशी खोटे बोलते तेव्हा तुम्हाला सर्वात जास्त त्रास होतो. पण तुम्हाला हे माहित असले पाहिजे की ती व्यक्ती तुमच्या प्रेमाला सत्यापेक्षा जास्त महत्त्व देत आहे.
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
त्यांच्यासाठी काहीही करु नका. जर तुम्ही स्वतःसाठी एखाद्याला क्षमा करत असाल तर ते करणे चांगले. कारण अन्यथा ती व्यक्ती तुमच्या डोक्यात घर करुन बसते आणि तुम्हाला रात्रंदिवस त्रास देते. तुमचा राग ही दुसऱ्याच्या चुकीसाठी तुम्ही स्वतःला दिलेली शिक्षा आहे.
एखादे नाते तुमच्यासाठी चांगले आहे की वाईट हे कसे ओळखावे
एखाद्याबद्दल मत बनवण्यापूर्वी, तुम्ही त्यांच्याशी कसे संबंध ठेवता ते पहा. त्यांना सामावून घेण्यासाठी तुमचे हृदय किती विशाल आहे?
समांतर रेषांची उपमा येथे एकदम समर्पक आहे. जर दोन रेषा समांतर जात असतील तर त्या अनंतापर्यंत तशाच जातात. परंतु जर रेषा एकमेकांवर केंद्रित असतील तर त्या एकमेकीना छेदतील. जर त्या दूर जात असतील तर त्या एकमेकांपासून खूप दूर जातील. नातेसंबंध हे असेच असतात.
जर तुम्हाला नातेसंबंध कायमचे टिकवायचे असतील, तर तुमचे ध्येय एकच असले पाहिजे. एकमेकांवर लक्ष केंद्रित करु नये किंवा एकमेकांच्या वर्तनावर पहारा करत बसू नये. जर तुमचे लक्ष फक्त एकमेकांवर असेल, तर तुम्ही एका दिवशी गोड असाल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही दुसऱ्या व्यक्तीसाठी कटु व्हाल. समान ध्येय असेल तर तुम्ही गोष्टी चांगल्या प्रकारे साध्य करु शकाल आणि नाते टिकून राहील.
सहनशक्तीचा अंत
दुखावले जायचे किंवा नाही ही तुमची निवड आहे. कनवाळू राहा. जोडीदाराला इशारा द्या. त्यांना सांगा की तुम्ही सतत सहन करत आहात आणि त्यामुळे तुम्हाला दुःख होत आहे.
त्या व्यक्तीला विचारा, “तुम्ही काय बोलत आहात याची तुम्हाला जाणीव आहे का? तुमचा हेतू मला दुखावण्याचा आहे का?”
त्या व्यक्तीला एक, दोन किंवा तीन वेळा संधी द्या. मग तुम्हीच ठरवा की तुम्हाला त्रास करुन घ्यायचाय की मनःशांती हवी आहे ? अजूनही त्या व्यक्तीचे वर्तन चांगले नसेल,तर समजा की ती बिघडली आहे, आजारी आहे. किंवा जर त्यांच्याबरोबर जुळत नसेल, तर तुम्ही म्हणा, “तुम्हाला तुमचे आयुष्य आहे. मला माझे आहे. आपण असे राहू शकत नाही.” आणि तुम्ही तुमच्या मार्गाने पुढे जा.
नातेसंबंध होण्यापूर्वी आयुष्य छान होते. नाते निर्माण झाल्यानंतरही ते छान असेल!
– गुरुदेव श्री श्री रवि शंकर
विभक्त होण्याचा यशस्वीपणे सामना करा
जेव्हा एखादे नाते तुटते तेव्हा तुम्ही अत्यंत दुःखी होता. पण जागे व्हा आणि पहा! नाते निर्माण होण्यापूर्वी तुम्ही जगत होता आणि सर्वकाही करत होता. तुम्ही हसत खिदळत होता. तुम्ही आनंदी होता. त्या व्यक्तीला भेटण्यापूर्वी आणि नाते निर्माण होण्यापूर्वीचे दिवस आठवा. तेव्हाही आयुष्य छान होते. आता नंतर सुद्धा छान असेल!
म्हणजे तुम्ही संपूर्ण गोल फिरुन पुन्हा त्याच ठिकाणी आलात! यासाठी नाराज होऊ नका. ते नातं संपलं आहे!

















