ज्योतिर्लिंग हे भगवान शिवाचे अद्वितीय प्रतिनिधित्व आहेत. ज्योती म्हणजे ‘प्रकाश’ आणि लिंग म्हणजे ‘चिन्ह. ज्योतिर्लिंग म्हणजे ‘भगवान शिवाचे तेजस्वी चिन्ह’.
ज्योतिर्लिंगामागील आख्यायिका
एकदा भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांच्यात सर्वोच्च निर्माता कोण यावर वाद झाला. या वादावर तोडगा काढण्यासाठी, भगवान शिव प्रकाशाच्या एका विशाल स्तंभाच्या रूपात प्रकट झाले आणि त्यांना स्तंभाचा शेवट शोधण्यास सांगितले. दोघांनाही अंत सापडत नव्हता. प्रकाशाच्या स्तंभाची वरील आख्यायिका ज्योतिर्लिंग मंदिरांतील अभिव्यक्तीमध्ये आढळते, जिथे भगवान शिव प्रकाशाच्या लिंगाच्या रूपात प्रकट झाले.
भारतातील १२ ज्योतिर्लिंगे
देशात एकूण १२ ज्योतिर्लिंगे आहेत आणि ती सर्व हिंदूंसाठी पवित्र स्थळे आहेत. प्रत्येक ज्योतिर्लिंगाची निर्मिती कशी झाली यामागे वेगळी कथा आहे. प्रत्येकाला एक स्थळ पुराण (स्थानिक लोककथा किंवा दंतकथा) जोडलेले आहे.
१. सोमनाथ – गुजरात
सोमनाथ ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील सौराष्ट्र प्रदेशातील प्रभास पाटण येथे आहे. एकदा चंद्र देवतेला प्रजापती दक्षाने आपली चमक गमावण्याचा शाप दिला होता. त्यानंतर त्याने शापातून मुक्त होण्यासाठी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली. भगवान शिव त्याच्यासमोर प्रकट झाले आणि शाप कमी केला. चंद्राला दर महिन्याला पंधरवड्यापर्यंत कलेकलेने वाढण्याची आणि घटण्याची परवानगी होती. चंद्र देवाने कृतज्ञ होऊन भगवान शिवाच्या सन्मानार्थ ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. या ज्योतिर्लिंगाला सोमनाथ असे नाव देण्यात आले, ज्याचा अर्थ “चंद्राचा स्वामी” आहे.

२. मल्लिकार्जुन – आंध्रप्रदेश
मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग आंध्र प्रदेशातील श्रीशैल्यम येथे आहे. एकदा भगवान कार्तिकेय त्याच्या आई-वडिलांवर – शिव आणि पार्वती यांच्यावर नाराज झाले होते,कार्तिकेयाला वाटले की त्याला अन्यायकारक वागणूक दिली गेली. तो कैलास सोडून श्रीशैल्यम पर्वतावर राहण्यासाठी दक्षिणेकडे आला. त्याचे आई-वडील त्याच्या मागे गेले आणि आपल्या मुलाच्या परिसरात आदिवासींच्या वेशात राहत होते. भगवान कार्तिकेयाला जेव्हा हे कळले तेव्हा त्यांनी आपल्या आईवडिलांची पूजा केली आणि श्रीशैल्यम येथे ज्योतिर्लिंगाची स्थापना केली. कृष्णा नदीच्या काठावर प्रकट झालेल्या शिवाचे हे रूप अर्जुन म्हणून ओळखले जात होते, तर माता पार्वतीला मल्लिका म्हटले जाते. ज्योतिर्लिंगाला मल्लिकार्जुन असे एकत्रित नाव देण्यात आले.
३. महाकालेश्वर – मध्य प्रदेश
महाकालेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील उज्जैन या ऐतिहासिक शहरात वसलेले आहे. प्राचीन काळात, उज्जैनवर राजा चंद्रसेनचे राज्य होते ,जे भगवान शिवाचे महान भक्त होते. त्या काळात प्रतिस्पर्धी राज्यांतील राजांनी उज्जैनवर हल्ला केला होता. राजा चंद्रसेन आणि इतर भक्तांनी त्यांना पराभव आणि विनाशापासून वाचवण्यासाठी भगवान शिवाला वारंवार विनंती केली तेव्हा शत्रूंनी शहराचा ताबा जवळपास घेतला होता. भगवान शिव कालांतराने महाकाल स्वरूपात प्रकट झाले आणि त्यांनी राजा चंद्रसेनच्या शत्रूंचा नायनाट केला. राजा आणि इतर भक्तांच्या विनंतीवरून, भगवान शिव उज्जैनमध्ये महाकालेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट होण्यास तयार झाले. तो काळाचा स्वामी आहे.
४. ओंकारेश्वर – मध्य प्रदेश
ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग हे मध्य प्रदेशातील नर्मदा नदीवरील मांधाता बेटावर आहे. राजा मांधाताने भगवान शिवाची मर्जी जिंकण्यासाठी येथे तपश्चर्या केली होती म्हणून या बेटाला हे नाव देण्यात आले आहे. तेव्हा भगवान शिव या ज्योतिर्लिंगाच्या रूपात त्यांच्यासमोर प्रकट झाले होते. मांधाता बेट ओमच्या आकारात असून हे ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. तो ओंकाराचा (ओम कंपन) प्रभु आहे.
५. केदारनाथ – उत्तराखंड
केदारनाथ ज्योतिर्लिंग हे उत्तराखंडमधील हिमालयात उंचावर स्थित आहे. महाभारत युद्धानंतर पांडवांनी भगवान शिवाला प्रसन्न करण्यासाठी तपश्चर्या केली होती आणि युद्धादरम्यान झालेल्या चुकीची क्षमा मागितली होती. तथापि, भगवान शिव पांडवांसमोर सहजपणे प्रकटले नाहीत. परमेश्वराने बैलाचे रूप धारण केले आणि शेताच्या खाली, जमिनीखाली लपले. अखेरीस त्यांनी स्वतःची एक झलक अशा ठिकाणी दिली जिथे पांडव बंधूंनी नंतर ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. केदार म्हणजे शेत आणि या ज्योतिर्लिंगाला केदारनाथ म्हणतात कारण भगवान शिव शेतात लपले होते. तो क्षेत्राचा परमेश्वर (नाथ) आहे.
६. भीमाशंकर – महाराष्ट्र
भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील पुण्याजवळील भोरगिरी गावात आहे. भीम हा रावणाचा भाऊ कुंभकर्णाचा मुलगा होता ज्याचा भगवान रामाने वध केला होता. आपल्या वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, त्याने ब्रह्मदेवाची प्रार्थना केली आणि अनेक शक्तिशाली वरदान प्राप्त केले. त्या राक्षसाने जगभर हाहाकार माजवायला सुरुवात केली. दरम्यान, कामरूपेश्वर हा प्रखर शिवभक्त शिवलिंगाची पूजा करत होता. भीमाने जेव्हा या लिंगाचा नाश करण्याचा प्रयत्न केला तेव्हा भगवान त्या लिंगातून प्रकट झाले आणि भीमाची राख झाली. देवांनी आणि ऋषींनी भगवान शिवाला विनंती केली की त्यांनी ज्या ठिकाणी भीमाला पराभूत केले त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट व्हावे, ज्याला भीमाशंकर म्हणून ओळखले जाते.
७. विश्वनाथ – उत्तर प्रदेश
विश्वनाथ ज्योतिर्लिंग हे काशी, उत्तर प्रदेश येथे आहे. पौराणिक कथेनुसार, भगवान शिवाने इतर सर्व देवतांवर आपले वर्चस्व दाखवले, काशी येथे प्रकाश स्तंभाच्या रूपात प्रकट झाले, पृथ्वीचे कवच फोडून आणि आकाशाकडे अपरिमितपणे उठून. त्यानंतर त्याला सर्व खगोलीय लोकांनी विश्वाचा स्वामी (विश्वनाथ) म्हणून गौरवले. ज्या ठिकाणी भगवान शिवाने आपला महिमा प्रकट केला होता त्या ठिकाणी ज्योतिर्लिंगाची स्थापना केली होती. या ज्योतिर्लिंगाशी इतर अनेक आख्यायिका निगडीत आहेत.
८. त्र्यंबकेश्वर – महाराष्ट्र
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील नाशिकजवळ आहे. एके काळी गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी येथे वास्तव्य करत होते. त्यांना भगवान वरुणांनी अथांग असा धान्य साठवण्याचा खळगा देऊन, अन्नधान्यांचा अपार पुरवठा केला होता. इतर ऋषींना गौतमाच्या तपश्चर्येचा आणि समृद्धीचा हेवा वाटू लागला. त्यांनी त्यांच्या आश्रमात एका भ्रामक गायीचा नाश केला आणि गौतमाची बदनामी व्हावी म्हणून ठपका त्यांच्यावर ठेवला. त्यानंतर गौतमाने गंगा आपल्या आश्रमात आणण्यासाठी, ते स्थान शुद्ध करण्यासाठी भगवान शिवाची प्रार्थना केली. भगवान शिव ऋषींच्या समोर प्रकट झाले आणि त्यांनी गंगेला त्यांच्या आश्रमातून वाहण्याची विनंती केली. ही गोदावरी नदी आहे. गौतम ऋषी आणि इतरांच्या विनंतीवरून, भगवान शिव नदीकाठी त्र्यंबकेश्वर नावाच्या ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले. तो तीन नेत्रांचा भगवान (त्र्यंबक) आहे.

९. वैद्यनाथ – झारखंड
झारखंडमधील देवघर जिल्ह्यात वैद्यनाथ ज्योतिर्लिंग आहे. भगवान शिव, रावणाच्या तपश्चर्येवर प्रचंड प्रसन्न होऊन, त्याला लंकेत स्थापित करण्यासाठी एक ज्योतिर्लिंग देऊ केले होते , जे त्याला तिन्ही लोकांमध्ये अजिंक्य बनवेल. तथापि, भगवानांनी रावणाला ताकीद दिली की लिंगाला लंकेत नेत असताना, त्याने कोणत्याही कारणास्तव ते जमिनीवर ठेवू नये. कैलासहून लंकेला जाताना रावणाला थोडी तंद्री लागली आणि त्याला विश्रांतीची इच्छा झाली. त्याने लिंग जवळच्या एका लहान मुलाला काही मिनिटे धरण्यासाठी दिले. मुलाला त्याचे वजन सहन होत नव्हते आणि त्याने त्याला जमिनीवर ठेवले. रावण पुन्हा उचलू शकला नाही म्हणून ते कायमचे जमिनीवर अडकले. हे लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग बनले. तो वैद्यांचा (वैद्य) स्वामी आहे.
१०. नागेश्वर – गुजरात
नागेश्वर ज्योतिर्लिंग हे गुजरातमधील द्वारका जिल्ह्यात आहे. दारुका नावाच्या राक्षसाने सुप्रिया नावाच्या शिवभक्ताला समुद्राखालच्या एका शहरात कैद केले होते, ज्यामध्ये सागरी नागांचे वास्तव्य होते. तुरुंगात, सुप्रिया आणि इतर भक्तांनी भगवान शंकराचा सतत मंत्र जपत त्यांना आवाहन केले. भगवान शिव तेथे प्रकट झाले आणि त्यांनी राक्षसाचा पराभव केला आणि आपल्या सर्व भक्तांना वाचवले. त्यानंतर त्यांनी द्वारका येथील समुद्रकिनारी नागेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून स्वतःची स्थापना केली. तो सर्व नागांचा (नाग) स्वामी आहे.
११. रामेश्वरम – तामिळनाडू
रामेश्वरम ज्योतिर्लिंग हे भारताच्या दक्षिण टोकाला तामिळनाडूमध्ये आहे. हे लिंग स्वतः भगवान रामाने स्थापित केले होते, त्यांनी रावणाविरुद्धच्या युद्धात भगवान शिवाचा आशीर्वाद मागितला होता. तो रामाने पूजलेला परमेश्वर आहे.
१२. घृष्णेश्वर – महाराष्ट्र
घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यात आहे. कुसुमा ही भगवान शिवाला समर्पित असलेली अत्यंत धार्मिक स्त्री होती. दैनंदिन विधीचा भाग म्हणून ती दररोज एका तलावात शिवलिंगाचे विसर्जन करून आपल्या प्रभूची पूजा करत असे. तिच्या पतीला दुसरी पत्नी होती ,जी कुसुमाच्या समाजातील वाढत्या प्रतिष्ठेमुळे तिचा द्वेष करू लागली. कटुतेतून निर्माण झालेल्या रागाच्या भरात तिने कुसुमाच्या एकुलत्या एक मुलाची हत्या केली. आपल्या मुलाचा खून झाल्याचे ऐकून कुसुमा खरोखर उदास झाली, परंतु तिने भगवान शिवाची पूजा करणे चालू ठेवले. तिच्या समतुल्य भक्तीने भगवान शिव अत्यंत प्रसन्न झाले आणि कुसुमाने शिवलिंग पाण्यात विसर्जित केल्यावर तिचा मुलगा पुन्हा जिवंत झाला. त्यानंतर भगवान शिव कुसुमा आणि ग्रामस्थांच्या समोर प्रकट झाले. कुसुमाच्या प्रार्थनेवर, भगवान शिव ज्योतिर्लिंगाच्या रूपात प्रकट झाले, जे करुणेचा परमेश्वर म्हणून घृष्णेश्वर असे ओळखले गेले.
देशाच्या विविध भागात ज्योतिर्लिंगांची स्थापना करण्याचे उद्दिष्टे
भारतातील लोक वेगवेगळ्या भाषा बोलतात. काशीमध्ये लोक एक भाषा बोलतात तर रामेश्वरममधील लोक दुसरी भाषा बोलतात. प्राचीन काळी, लोकांना प्रथम रामेश्वरमला जाण्यास सांगितले जायचे आणि तेथून त्यांना काशीच्या यात्रेला जाऊन पवित्र गंगा स्नान करावे लागे. त्यानंतर त्यांना गंगेचे पवित्र पाणी काशीहून रामेश्वरमला आणून तिथल्या ज्योतिर्लिंगाला अर्पण करावे लागले. आणि त्यानंतर, त्यांना ते अर्पण पुन्हा काशी विश्वनाथ मंदिरात नेण्यास सांगण्यात आले.
प्राचीन काळी असे करण्यामागील हेतू हा होता की, देशाच्या विविध भागात असलेल्या या पवित्र तीर्थांना लोकांना भेट देऊन राष्ट्रीय एकात्मतेची भावना निर्माण करावी. जेव्हा लोक देशाच्या वेगवेगळ्या भागात एकत्र तीर्थयात्रा करतात तेव्हा ते एकमेकांशी मैत्रीचे बंध प्रस्थापित करतात.
गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, “जेव्हा आपण पवित्रता आणि पवित्रतेच्या भावनेने काहीही करतो , तेव्हा आपले संपूर्ण चैतन्य फुलू लागते. म्हणूनच सर्व १२ ज्योतिर्लिंगे कधीही एकाच ठिकाणी किंवा एकाच राज्यात ठेवली गेली नाहीत. काही उत्तरेत, काही दक्षिणेत, काही पश्चिमेत – ते सर्वत्र बांधले गेले.”
राष्ट्राचे एकीकरण
आणि त्या काळात ज्योतिर्लिंगाच्या या स्थानांवर जाणे सोपे नव्हते. तिथपर्यंत पोहोचणे खूप कठीण होते. या देवस्थानांपर्यंत जाण्यासाठी एखाद्याला घनदाट जंगले, धोकादायक दऱ्या, शहराचे अवशेष किंवा बर्फाच्छादित पर्वत पार करावे लागले. उदाहरणार्थ, केदारनाथ हे हिमालय पर्वतरांगेत उंचावर वसलेले आहे. अशाप्रकारे, देशाच्या विविध भागांमध्ये भगवान शिवाला समर्पित पवित्र तीर्थस्थानांची स्थापना करून, त्या काळातील पवित्र ऋषी आणि संतांनी एकसंध राष्ट्र निर्माण केले.
ज्योतिर्लिंग तीर्थमार्ग
आता तुम्हाला ज्योतिर्लिंगांचे महत्त्व आणि त्या प्रत्येकामागील कथा माहीत असल्याने तुम्ही ज्योतिर्लिंगाच्या यात्रेला जाण्याचा विचार करत आहात कां ? तुमच्या प्रवासाचे नियोजन कसे करावे याबद्दल तुम्ही थोडे गोंधळलेले आहात? काळजी करू नका, तुम्ही कुठे आहात यावर आधारित तुमच्यासाठी आमच्याकडे एक क्रम आहे.
उत्तर भारतातून
तुम्ही उत्तरेत राहत असाल तर उत्तराखंडमधील केदारनाथ हे तुमचे पहिले गंतव्यस्थान असेल. येथून तुम्ही उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ आणि झारखंडमधील वैद्यनाथ येथे जाता. त्यानंतर तुम्ही पूर्वेकडे उत्तर प्रदेशातील ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरकडे जा. आता गुजरातमधील नागेश्वर आणि सोमनाथ येथे प्रवास करा. तिथून पुढे महाराष्ट्रात जा जेथे तुम्ही त्या क्रमाने घृष्णेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वरला भेट द्या. यानंतर, आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन आणि शेवटी तामिळनाडूमधील रामेश्वरमला जा, जिथे तुमची तीर्थयात्रा संपते.
तुमच्यासाठी ज्योतिर्लिंग मार्ग:
केदारनाथ – काशी विश्वनाथ – वैद्यनाथ – ओंकारेश्वर – महाकालेश्वर – नागेश्वर – सोमनाथ – घृष्णेश्वर – भीमाशंकर – त्र्यंबकेश्वर – मल्लिकार्जुन – रामेश्वरम
दक्षिण भारतातून
दक्षिणेत राहणाऱ्यांसाठी, तामिळनाडूमधील रामेश्वरम हे तुमचे पहिले गंतव्यस्थान असेल. येथून तुम्ही आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन येथे जा. आता पश्चिमेकडे तीन ज्योतिर्लिंग असलेल्या महाराष्ट्रात जा. भीमाशंकर हे तुमचे पहिले गंतव्यस्थान असेल, त्यानंतर घृष्णेश्वर आणि त्र्यंबकेश्वर. त्यानंतर, तुम्ही ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरचे घर असलेल्या मध्य प्रदेशात प्रवास करता. येथून गुजरात अगदी जवळ आहे, जिथे तुम्ही नागेश्वर आणि सोमनाथला भेट देता. गुजरातपासून, तुमचा प्रवास तुम्हाला थेट हिमालयात उत्तराखंडमधील केदारनाथपर्यंत घेऊन जातो. उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ आणि झारखंडमधील वैद्यनाथ ही तुमची अंतिम ठिकाणे असतील, घरी परत जाण्यापूर्वी.
तुमच्यासाठी ज्योतिर्लिंग मार्ग:
रामेश्वरम – मल्लिकार्जुन – भीमाशंकर – घृष्णेश्वर – त्र्यंबकेश्वर – ओंकारेश्वर – महाकालेश्वर – सोमनाथ – नागेश्वर – केदारनाथ – काशी विश्वनाथ – वैद्यनाथ
पश्चिम भारतातून
जर तुम्ही पश्चिमेला वसलेले असाल, तर त्या क्रमाने महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर, भीमाशंकर आणि घृष्णेश्वर या तीनही ज्योतिर्लिंगांना भेट द्या. आता गुजरातमधील नागेश्वर आणि सोमनाथकडे जा. येथून तुम्ही मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर आणि महाकालेश्वरला जाता. यानंतर उत्तराखंडमधील केदारनाथला भेट द्या. त्यानंतर, उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ आणि तेथून उत्तराखंडमधील वैद्यनाथ येथे या. तुमचा प्रवास आता तुम्हाला दक्षिणेकडे आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन आणि शेवटी तामिळनाडूमधील रामेश्वरमपर्यंत घेऊन जाईल.
तुमच्यासाठी ज्योतिर्लिंग मार्ग:
त्र्यंबकेश्वर-भीमाशंकर-गृष्णेश्वर-सोमनाथ-नागेश्वर-ओंकारेश्वर-महाकालेश्वर-केदारनाथ-काशी विश्वनाथ-वैद्यनाथ-मल्लिकार्जुन-रामेश्वरम
पूर्व भारतातून
पश्चिम भारतातून पूर्वेकडून सुरू होणाऱ्यांसाठी, झारखंडमधील वैद्यनाथ हा तुमचा पहिला मुक्काम असेल. येथून, उत्तर प्रदेशातील काशी विश्वनाथ आणि तेथून हिमालयातील केदारनाथला जा. तुमचे पुढील गंतव्यस्थान मध्य प्रदेशातील महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर आहे. येथून तुम्ही गुजरातमधील नागेश्वर आणि सोमनाथ येथे जा. त्यानंतर, त्या क्रमाने घृष्णेश्वर, भीमाशंकर आणि त्र्यंबकेश्वर येथे जाण्यासाठी महाराष्ट्रात प्रवास करा. येथून, आपल्या यात्रेचा शेवटचा टप्पा आंध्र प्रदेशातील मल्लिकार्जुन असेल आणि घरी परत जाण्यापूर्वी शेवटी तामिळनाडूमधील रामेश्वरमचा प्रवास करा.
तुमच्यासाठी ज्योतिर्लिंग मार्ग:
वैद्यनाथ – काशी विश्वनाथ – केदारनाथ – महाकालेश्वर – ओंकारेश्वर – सोमनाथ – नागेश्वर – घृष्णेश्वर – भीमाशंकर – त्र्यंबकेश्वर – मल्लिकार्जुन – रामेश्वरम
सात ज्योतिर्लिंगे एकत्र
१२ ज्योतिर्लिंगांपैकी सात गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या शेजारील राज्यांमध्ये एकमेकांच्या अगदी जवळ वसलेले आहेत आणि त्यात पुढील गोष्टींचा समावेश आहे:
- सोमनाथ – गुजरात
- नागेश्वर – गुजरात
- महाकालेश्वर – मध्य प्रदेश
- ओंकारेश्वर – मध्य प्रदेश
- घृष्णेश्वर – महाराष्ट्र
- भीमाशंकर – महाराष्ट्र
- त्र्यंबकेश्वर – महाराष्ट्र
ही ज्योतिर्लिंगे एकमेकांच्या सान्निध्यात असल्यामुळे अगदी सहजपणे जाऊ शकतात. त्याचप्रमाणे केदारनाथ, काशी विश्वनाथ आणि वैद्यनाथ हे तुलनेने एकमेकांच्या जवळ आहेत आणि ते एकमेकांना जोडून यात्रा पूर्ण करता येईल. दक्षिणेला मल्लिकार्जुन आणि रामेश्वरम अशी दोन ज्योतिर्लिंगे आहेत.
१२ ज्योतिर्लिंगा बद्दल अधिक माहिती जाणून घ्या
त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग रामेश्वरम ज्योतिर्लिंग केदारनाथ ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग महाकालेश्वर ज्योतिर्लिंग मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग भीमाशंकर ज्योतिर्लिंग ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग नागेश्वर ज्योतिर्लिंग सोमनाथ ज्योतिर्लिंग काशी विश्वनाथ ज्योतिर्लिंग वैद्यनाथ ज्योतिर्लिंग












